हिंगोली : उन्हाळी सुट्या संपून नव्या शिक्षण पद्धतीतील शिक्षणाला सोमवारपासून सुरुवात झाली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पात्र ८२ हजार ८८१ विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी पाठ्यपुस्तके पहिल्या दिवशी मिळाली. मात्र, अद्यापही गणवेशासाठी लागणारा निधी शाळा समितीपर्यंत पोहोचला नसल्याने गणवेश वाटपाचे काम रखडले आहे. गणवेशासाठी लागणारा निधी वर्ग करण्यासाठी अद्याप तरी अनेक शाळांमधून बँकेत खातेच उघडले नसल्याने ही प्रक्रिया पूर्ण कधी होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश, एक बुट जोड अन् दोन जोड पायमोजे मोफत पुरविण्यात येणार आहेत. यासाठी लागणारा ३ कोटी ८९ लाख ५४ हजार ७० रुपयांचा निधी तालुका स्तरावर पंचायत समितीकडे वितरीत करण्यात आला आहे. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून शाळा व्यवस्थापन समितीद्वारे गणवेश वाटप करण्यात येणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.

हिंगोली तालुक्यातील माळहिवरा हे अडीच ते तीन हजार लोकवस्तीचे गाव. येथे पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. शाळेत १३१ विद्यार्थी आहेत. सोमवारी शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आली. परंतु, या शाळेत अद्याप गणवेश वाटपासाठीचा निधी प्राप्त झाला नाही. अशीच काही अवस्था खंडाळा गावच्या शाळेची आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणवेश खरेदीसाठी २.४८ कोटींची आवश्यकता

मोफत गणवेशासाठी प्रति गणवेश ३०० रुपये या प्रमाणे रक्कम निश्चित केली आहे. ही रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना आहेत. प्रति विद्यार्थी ३०० रुपये प्रमाणे २ कोटी ४८ लाख ६४ हजार ३०० रुपयांचा निधी गट स्तरावर अद्याप वर्ग झाला नाही. मात्र, लवकरच ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.