अहिल्यानगर : आष्टी (जिल्हा बीड) तालुक्यातील वन क्षेत्रातील एका तांड्यावर मजुरी कामासाठी डांबून ठेवलेल्या १५ लहान मुलांची नगरचे सहायक कामगार आयुक्त, जिल्हा बालकल्याण समिती व स्वयंसेवी संस्थांच्या कृती दलाने आज, शनिवारी मुक्तता केली. या बालकांना बीडच्या बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे.

सहायक कामगार आयुक्त आर. एम. भिसले व जिल्हा बालकल्याण समितीच्या सदस्य ॲड. अनुराधा येवले यांनी ही माहिती दिली. सुटका केलेल्यांमध्ये ९ मुली व ६ मुलांचा समावेश आहे. सर्वजण ९ ते १२ वयोगटातील आहेत.

या कारवाईमध्ये सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचे संदीप हरमळकर, ललित दाभाडे, उदयकुमार सूर्यवंशी, सौरभ हामंद, समितीच्या सदस्य ॲड. अनुराधा येवले, अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संस्थेचे दिलीप गुंजाळ, शिराज शेख, मंगेश थोरात, संध्या कुलकर्णी, मयूरी वणवे, महापालिकेचे आशिष हंस, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सहायक फौजदार अजय बेरड, जालिंदर माने, अशोक लिपणे, रमाकांत गावडे, महिला पोलीस ज्योती शिंदे, चाइल्ड लाइन संस्थेचे राहुल वैराळ यांनी सहभाग घेतला.

या संदर्भात अधिक माहिती देताना बालकल्याण समितीच्या सदस्य ॲड. अनुराधा येवले यांनी सांगितले, की नगरच्या एमआयडीसीमधील सन फार्मा कंपनीच्या परिसरात दोन अल्पवयीन बालके फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी १२ जूनला बालकल्याण समितीला दिली व ही दोन बालके समितीसमोर हजर केली. समितीच्या सदस्यांनी चौकशी केली असता त्यांना मारहाण होत असल्याने ते पायी चालत नगर एमआयडीसीमध्ये आल्याचे आणि आष्टीतील तांड्यावर आणखी मुले असल्याची माहिती दिली.

या मुलांकडून गुरे चारणे, भांडी घासणे, कपडे धुणे, पाय चेपून घेणे अशी कामे तांड्यावरील मालकांकडून करून घेतली जात होती. या तांड्यावरील मालकांकडे या बालकांचे पालक काम करत होते. हे पालक कर्नाटकमधील कोळसा खाणीवर कोळसा पाडण्याचे काम करतात. पालक पळून जाऊ नयेत यासाठी तांडामालकाने त्यांच्या मुलांना आष्टीमध्ये आणून ठेवले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहायक कामगार आयुक्त व बालकल्याण समितीने माहिती मिळवल्यानंतर आज पथक सेवालाल तांडा (गहूखेल, आष्टी, बीड) येथे रवाना झाले. परंतु तेथे गेल्यानंतर हे क्षेत्र बीड जिल्ह्यात असल्याचे समजले. परंतु बालकांची काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असल्याने बालमजुरांची सुटका करून त्यांना अंभोरे पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले. नंतर ही बालके काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने बीड बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आल्याचे ॲड. येवले यांनी सांगितले.