Abhishek Bachchan Talks About Dhoom 2 Movie : कलाकार आणि चित्रपट निर्माते यांच्यात अनेकदा मतभेद होत असतात, असं अनेक कलाकार मुलाखतींमधून सांगताना दिसतात. असंच काहीसं अभिनेता अभिषेक बच्चनबरोबरही झालं होतं. अभिनेत्याने स्वत: याबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. अभिषेकने त्याच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रसिद्ध निर्मात्यांसह मतभेद झाल्याचं सांगितलं आहे.
अभिषेक बच्चनने ‘ई टाईम्स’शी संवाद साधताना याबाबत सांगितलं. यावेळी अभिषेकने ‘धूम २’ चित्रपटाच्या सेटवर निर्मात्यांसह भांडण झाल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटात अभिषेकने एसीपी जय दीक्षित हे पात्र सााकरलं होतं. त्याच्यासह यामध्ये अभिनेता हृतिक रोशन, ऐश्वर्या राय बच्चन, बिपाशा बासू हे कालकार झळकले होते.
‘धूम २’ चित्रपटाच्या एका सीनच्या चित्रीकरणादरम्यान अभिषेक बच्चनचं चित्रपटाचा निर्माता आदित्य चोप्राबरोबर वाद झाला होता. अभिषेक मुलाखतीत म्हणाला, “चित्रपटात एक सीन आहे, जिथे मी हृतिक रोशनच्या मागावर होतो, त्यामुळे मी त्याला हवं ते करू देत होतो; कारण माझा त्याला पकडण्याचा प्लॅन होता. पण, पुढे या सीननंतर लगेच एक गाणं आहे, जिथे चित्रपटातील सर्व कलाकार नृत्य करत असतात. त्यावेळी त्या गाण्यात मीसुद्धा सहभागी व्हावं अशी निर्मात्याची अपेक्षा होती”.
अभिषेक पुढे म्हणाला, “मला वाटत होतं की मी जर एक खूप गंभीर स्वभावाचा पोलिस आहे, ज्याने चोराला पकडण्याचं प्लॅनिंग केलं आहे, तो अचानक त्या सीननंतर नाचू कसा शकतो? हेच मला पटलं नव्हतं. मी म्हटलं त्यांच्यासह नाचण्यापेक्षा मी तिथे बारमध्ये बसेन आणि आर्यन, (हृतिक रोशन) मी ज्याच्या मागावर आहे त्याच्यावर नजर ठेवेन. पण, आदित्य ऐकत नव्हता. तो म्हणाला, प्रेक्षकांना तुम्हा सगळ्यांना एकत्र नाचताना पाहायला आवडेल आणि तेव्हा आमच्यामध्ये यावरून वाद झाला.”
अभिषेक पुढे याबाबत म्हणाला, “चित्रपटात काम करत असताना असे मतभेद अनेकदा होत असतात, यात काही वावगं नाही. चित्रपटाच्या शेवटी वाद मिटला होता, कारण या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे तुम्हाला मान्य करावं लागतं की काही गोष्टी अशा असतात, ज्या तुम्हाला कळत नाही.”