Akshay Kumar React Hera Pheri 3 Movie : राजू, श्याम आणि बाबू भैय्या… हे त्रिकुट असलेला ‘हेरा फेरी’ हा चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे. या चित्रपटाचे आजवर दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच ‘हेरा फेरी ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच अनेक जण या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

पण काही दिवसांपुर्वी सर्वांचेच आवडते बाबू भैय्या म्हणजेच अभिनेते परेश रावल यांनी चित्रपटातून एक्झिट घेत असल्याची घोषणा केली. परेश रावल यांनी एक्झिटची घोषणा करताच अनेकांचा हिरमोड झाला. त्यानंतर काही दिवसांपासून ‘हेरा फेरी ३’ बद्दलच्या अनेक चर्चा समोर येत आहेत. परेश रावल यांचे अनेक चाहते त्यांना चित्रपटात पुन्हा येण्यासाठी सोशल मीडियासह सर्वच माध्यमांद्वारे परत येण्याची विनंती करत आहेत.

अशातच अक्षयने ‘हेरा फेरी ३’च्या चर्चांवर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. पिंकव्हिलाशी बोलताना अक्षयने ‘हेरा फेरी ३’ आणि परेश रावल यांच्याबद्दल थेट विधान केलं नसलं, तरी त्याने जे घडत आहे; ते तुमच्यासमोरच आहे आणि सगळं काही चांगलं व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.

“खात्री आहे की सगळं काही चांगलंच होईल” : अक्षय कुमार

अक्षयला त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल विचारले असता, त्याने असं म्हटलं, “जे घडत आहे; ते तुमच्यासमोरच घडत आहे. माध्यमांना सगळं माहितच आहे. सगळं काही ठीक व्हावं अशीच माझीही आशा आहे आणि मला खात्री आहे की सगळं काही चांगलंच होईल.” ‘हेरा फेरी ३’बद्दल अक्षयने याआधीही प्रतिक्रिया दिली आहे.

फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

‘हाउसफुल्ल ५’च्या ट्रेलर लाँचदरम्यान अक्षय म्हणालेला, “मी परेश रावल यांच्याबरोबर गेली ३२ वर्ष काम करत आहे. आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि ते खूप कमाल अभिनेते आहेत. मी त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकलो आहे. हा खूप गंभीर मुद्दा आहे. हे प्रकरण सध्या न्यायालय हाताळत आहे. त्यामुळे याप्रकरणी न्यायलयच निर्णय देईल.”

दरम्यान, ‘हेरा फेरी’च्या दोन्ही भागांच्या यशामागे अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाची जादू आहे. हीच जादू ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या भागातही अनुभवता यावी अशी चाहत्यांची इच्छा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे आता ‘हेरा फेरी ३’मधील परेश रावल यांच्या एक्झिटवर नक्की काय तोडगा निघणार? ते या चित्रपटात पुन्हा परतणार का? आणि राजू, श्याम आणि बाबू भैय्या हे त्रिकुट पुन्हा पाहायला मिळणार का? हे येत्या काळात कळेल.