आई-वडलांचा घटस्फोट झालेला असेल आणि मुलांना आईनेच वाढवलेलं असेल तर मुलं आईच्या बाबतीत पझेसिव्ह होतात. आणि ते साहजिकच आहे. ‘वजनदार’ नाटकातील आई (मीना) अशीच मुलाशी (रोहन) घट्ट जवळीक असलेली. मुलगा आणि सून (प्राजक्ता) अमेरिकेत असतात. नवऱ्याने तिचं बाळंतपणानंतर वजन वाढल्याने तिच्याशी काडीमोड घेतलाय. ती आपल्या परीने ते घटवण्याचा प्रयत्न करते, पण ते कमीच होत नाही. याला कारण तिची मनोकायिक स्थिती. आता मात्र तिने डॉ. आजगावकरांच्या मार्गदर्शनाखाली वजन कमी करण्याचं चांगलंच मनावरच घेतलंय. एवढ्यात रोहन सपत्निक भारतात येतो आणि त्याच्यापासून आपलं वजन कमी करण्याचं मिशन लपवताना मीनाला नाकीनऊ येतात. डॉ. आजगावकर तिला रोहनला खरं खरं काय ते सांग म्हणून मागे लागतात. पण तिला धीर होत नाही. त्याला आपली आई आहे तशीच हवी असते. त्यामुळे तो आपल्या या ‘उद्याोगा’ने दुखावला जाईल अशी तिला भीती वाटते.

पण एके दिवशी हे भांडं फुटतंच. प्राजक्ता मीनाला यात लपवून ठेवण्यासारखं काय आहे असं विचारते. ती रोहनला आईच्या वजन कमी करण्याच्या मिशनची कल्पना देते.

पण… पण त्यापुढे जे घडतं ते सर्वसाधारणत: घटस्फोटित आई-वडलांच्या बाबतीत मुलं कशी वागतात त्याला धरूनच आहे. हे नक्की काय गौडबंगाल आहे हे प्रत्यक्ष नाटकात पाहणंच योग्य.

लेखिका संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी बहुधा प्रथमच कौटुंबिक जिव्हाळ्याच्या विषयाला या नाटकाद्वारे हात घातला असावा. त्यामुळे त्याचा पाया कच्चा राहिला आहे. ‘वजन’दार आईबद्दलचं मुलाचं ऑब्सेशन आणि मुलगा वजन कमी करण्याच्या प्रयत्नाला विरोध करेल ही आईची भीती ही मुळातच पटण्यासारखी गोष्ट नाही. तरीही क्षणभर धरून चालू, की तसं जरी असलं तरी त्यातून आई-मुलात दरी उत्पन्न होईल, ही भीतीच मुळात अनाठायी. त्यामुळे निम्म्याहून अधिक नाटकात या भीतीचं जे अवडंबर माजवलं गेलं आहे ते फिजूल आहे. राहता राहिली- शेवटची नाट्यपूर्ण कलाटणी. ती मात्र स्वीकारार्ह आहे. मुलाने आईला जे भोग भोगावे लागलेत त्या पार्श्वभूमीवर तसा विरोध करणं समजण्यासारखं आहे. असो. एकंदरीत डळमळीत पायावर बेतलेलं हे नाटक आहे. परंतु दिग्दर्शक संतोष वेरुळकर यांनी ते सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

अनेक छोटे छोटे प्रसंग प्रेक्षकांना धरून ठेवतात. विशेषत: घरातील मोलकरीण सरू आणि मीनामधले! रोहन, प्राजक्ता आणि मीना यांच्यातलं नातं तसं खेळीमेळीचं आहे. पण मीनाने डॉ. आजगावकरांना रोहनपासून लपवून ठेवण्यामागचं आणि त्याला संशयाला वाव देण्याचं काहीच कारण नाही. विशेषत: एकदाचं रोहनला आईच्या वजन कमी करण्याच्या मिशनबद्दल कळल्यावर! पण मग शेवटचा सस्पेन्स निर्माण करता आला नसता. शेवटची मीनाची कबुलीही काहीशी धक्कादायकच. दिग्दर्शक संतोष वेरुळकर यांनी हा कौटुंबिक ड्रामा चांगल्या प्रकारे हाताळला आहे. यातली सगळी पात्रं विश्वसनीय वाटतात… एक मीना सोडून! घटना-प्रसंगांची गुंफणही धरून ठेवणारी.

नेेपथ्यकार सचिन गावकर यांनी मीनाचं घर त्यातल्या वस्तूंसह छान उभं केलंय. अमोघ फडके यांनी प्रकाशयोजनेतून नाट्यात्म प्रसंग खुलवले आहेत. हर्षदा बोरकर यांची वेशभूषा आणि कमलेश बीचे यांची रंगभूषा नाटकाची मागणी पुरवणारी. मंदार देशपांडे यांचं पार्श्वसंगीत नाटकातील मुड्स ठळक करणारं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यातील सगळ्या कलाकारांनी चोख कामं केली आहेत. अलका कुबल-आठल्ये यांनी मीनाची भुसभुशीत पायावरची भूमिका आपल्या परीने कन्व्हिंसिंग करण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे. त्यांचे वजन कमी करण्यातले चढउतार, त्यातून हायपर होणं, मुलाला काय वाटेल याबद्दलची त्यांची भीती, डॉ. आजगावकरांना रोहनसमोर येऊ न देणं… यांतून आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अभय जोशी यांनी मनमोकळ्या, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे डॉ. आजगावकर छान उभे केले आहेत. अभिषेक देशमुख रोहन म्हणून फिट्ट बसलेत. त्यांची आईबद्दलची पझेसिव्ह वृत्ती त्यांनी नेमकी पकडलीय. समंजस स्वभावाची प्राजक्ता- साक्षी पाटील यांनी आवश्यक त्या ठामपणासह साकारलीय. सरू झालेल्या पूनम सरोदे लोभस. त्यांनी अनेक प्रसंग हसतेखेळते केलेत. त्यांचा उत्साही वावर नाटकात जान फुंकतो.