मुंबई : पावसाळा सुरू झाल्याने शहरामध्ये डेंग्यू व हिवतापासारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. विविध वसाहती व झोपडपट्ट्यांमध्ये या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. मात्र या साथीच्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसे कर्मचारीच नसल्याचे उघडकीस आले आहे. तसेच पदोन्नतीने २४२ पदे भरण्याकडे महापालकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. कर्मचाऱ्यांअभावी प्रभावीपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात अडथळे येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर वाढणारे डास आणि त्यांच्यापासून होणारे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका विविध ठिकाणी नियमित धूर फवारणी, जलसाठ्यांचे सर्वेक्षण, तापाचे रक्त नमुने संकलन आणि जनजागृती मोहीम राबवित आहे. मात्र सर्वेक्षण, धूर फवारणी व जनजागृतीसाठी आरोग्य विभागाकडे पुरेसा कर्मचारी नसल्याने काही ठिकाणी ही कामे थांबली आहेत. तर काही विभागांमध्ये दोन कर्मचाऱ्यांवर संपूर्ण प्रभागाचा भार आहे. परिणामी, शहरातील विविध वसाहती, झोपडपट्ट्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या परिसरांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून डेंग्यू व हिवतापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. सार्वजनिक ठिकाणी साचलेले पाणी, अकार्यक्षम सफाई व्यवस्था आणि अपुरी कीटकनाशक फवारणी यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. कर्मचाऱ्यांअभावी परिस्थिती हाताबाहेर जात असून, वेळेवर उपाययोजना न केल्यास मृत्यूदर वाढण्याची भीती आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

सामाजिक संघटना व कामगार संघटनांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने आरोग्य विभागात कर्मचारी भरती करून नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा पुरविण्याबाबत सामाजिक संघटना व कामगार संघटनांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिले आहे. पदोन्नतीची आणि रिक्त पदे तत्काळ भरावी, तसेच आवश्यक कर्मचारी नियुक्त करून उपाययोजना कराव्यात, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पदोन्नतीने २४२ पदे भरण्याकडे दुर्लक्ष

सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत स्वच्छता निरीक्षक ६७ पदे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक २६ पदे आणि कनिष्ठ अवेक्षकाची १४९ पदे मागील अनेक वर्षापासून रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी आरोग्य खात्याने कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपूर्वी कागदपत्रे जमा करण्यास सांगितले हाेते. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे जमा केली, मात्र अद्यापपर्यंत रिक्त जागा पदोन्नतीने भरण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यापैकी काही कर्मचारी पदोन्नती मिळण्यापूर्वीच सेवानिवृत्त होऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचारी संतप्त झाले आहेत.