मुंबईः गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिवडी परिसरात केलेल्या कारवाईत पिस्तुलांचा साठा जप्त केला. याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील २४ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तीन पिस्तुल, १० काडतुसे जप्त करण्यात आली. या मागे शस्त्रविक्री करणारी आंतरराज्यीय टोळी असल्याचा पोलिसांना संशय असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अजयकुमार सर्वेशकुमार दिवाकर (२४) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवडीमधील डॉकयार्ड येथील बीपीटी परिसरातील निर्जनस्थळी संशयीत तरूण शस्त्रांसह येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तेथील स्वयंभू इच्छापूर्ती गणेश मंदिरामागे पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयीत तरूण गुरूवारी या परिसरात आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन पिस्तुल, तीन मॅगझीन व १० जिवंत काडतुसे सापडली. शस्त्रांच्या कागदपत्रांबाबत विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अखेर त्याला त्याब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले. चौकशीत त्याने पिस्तुल विकण्यासाठी तेथे आल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. याप्रकरणी गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीकड देशी बनावटीची चांगल्या दर्जाची पिस्तुले सापडली. आरोपीचा मोबाइलही जप्त करण्यात आला आहे. त्याद्वारे तो कोणाच्या संपर्कात होता. याबाबत तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. उत्तर प्रदेश, बिहार व मध्य प्रदेशात अवैध शस्त्र निर्मिती करणाऱ्या अनेक टोळ्या आहेत. गेल्या काही वर्षांत अशा टोळ्यांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. मागील तीन वर्षांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्यातील गुन्हेगारांकडून तब्बल एक लाखांहून अधिक अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. तर बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत ६५ हजार अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षांत तेथील शस्त्रांचा दर्जाही खूप सुधारला आहे. देशभरात त्यांचे वितरण केले जात आहे. अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांचा दर्जाही परदेशी शस्त्रांइतका चांगला होता. देशातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे फार घातक आहे.